मुसळधार पावसाचा वीजयंत्रणेला तडाखा   

अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे वीजपुरवठा सुरळीत

पुणे : पुणे शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झाडपडीचे प्रकार घडले. वाहत्या पाण्यामुळे  वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. त्यात कोंढवा परिसरासह पुणे शहरातील काही भागात तसेच भोसरी व चाकण परिसरामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम केले. बुधवारी शहर व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. 
 
जोरदार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. चढ-उतार असलेल्या या भागात वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे ३८ फिडर पिलरमध्ये पाणी शिरले. वीजसुरक्षेची खबरदारी म्हणून कोंढवा, जेके पार्क व कुमारपाम या तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे कोंढवा परिसरातील सुमारे ३८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. पाऊस व पाणी ओसरल्यानंतर महावितरणचे अभियंते व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती कामे सुरू केली. पाणी शिरलेल्या फिडर पिलरमधील पाणी काढून कोरडे करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
 
शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. तसेच वीजखाबांवर झाडे व फांद्या पडल्यामुळे तारा तुटल्या. त्यामुळे महर्षीनगर, मार्केटयार्ड, प्रेमनगरचा काही भाग, मुंढवा, बंडगार्डन, फुरसुंगी, कोथरूड, शिवणे, धानोरी, धायरी फाटा आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. याच कारणांमुळे भोसरी गाव, तळवडे, देहू गाव, शेलारवस्ती, चिखली, चर्‍होली, दिघी, भोसरी गाव, यमूनानगर, विठ्ठलवाडी, रूपीनगर, आळंदी रोड, इंद्रायणीनगर, चिंचवड स्टेशन, संतनगर, आदर्शनगर, खडी मशीन, शांतीनगर या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या सर्व भागातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्ती कामे करून रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्यात आला.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध

वीजपुरवठा खंडित होणे किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचार्‍यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Related Articles